January 3, 2025 3:18 PM

views 43

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन

आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन आज गुवाहाटी इथं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोकराझार आकाशवाणी केंद्राच्या १० किलोवॅट प्रक्षेपकाचं आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेच उद्घाटनही मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं गुवाहाटी इथून झालं.  

October 28, 2024 2:51 PM

views 52

आसामच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी

आसामच्या ढोलाई, समगुरी, बेहाली, सिडली आणि बोंगाईगाव या पाच विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं.  सत्ताधारी भाजपनं तीन जागांवर, तर यूपीपीएल आणि असम गण परिषदेने प्रत्येकी एका जागेवर अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसनं पाचही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आप आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटनं, अनुक्रमे दोन आणि एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत.

August 6, 2024 11:28 AM

views 30

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत

आसाममधल्या गुवाहाटीमध्ये काल संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानं अचानक आलेल्या पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुवाहाटीमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या पुरामुळे गुवाहाटी महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयं, शिकवणी वर्ग आणि सर्व शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.

July 12, 2024 2:47 PM

views 62

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काहीशी सुधारणा

आसाममधल्या पूर परिस्थितीमध्ये काही अंशी सुधारणा झाली आहे. मात्र राज्यातल्या २६ जिल्ह्यांमधल्या अडीच हजार गावांत अजूनही पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत या पुरामुळे राज्यातली ३९ हजार हेक्टरवरली पिकं नष्ट झाली आहेत.  राज्यातल्या ब्रह्मपुत्रा, बुढीदिहिंग, दिसांग आणि कुशियारा या नद्यांनी पूररेषेची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

July 5, 2024 11:39 AM

views 64

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

आसाममध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे तिथली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातल्या 29 जिल्ह्यांतील 21 लाखांहून अधिक लोकांना पूराचा फटका बसला आहे. राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी पूरग्रस्त मोरीगाव जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरग्रस्तांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही माजुली, ढेमजी आणि लखीमपुर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.  

July 3, 2024 10:01 AM

views 40

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ३८ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. २८ जिल्ह्यांतील ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पुरामुळे मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यातील ८४ महसुली मंडळातील २ हजार २०८ गावांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बराक आणि त्यांच्या सर्व उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पुरामुळे ७४ रस्ते, १४ बंधारे आणि ६ पुलांचे नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं १४० मदत शिबिरं आणि ३५९ पुनर्वसन केंद्र उघडली आहेत.