सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी दिल्ली इथे सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे या विषयावर गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सायबर गुन्ह्यांनी भौगोलिक सीमा पुसून टाकल्या असून त्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार अभिसरण, समन्वय, संवाद आणि क्षमता यांच्यावर भर देत असल्याचं शहा यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश डिजिटल क्रांतीचा साक्षीदार होत असताना, सायबर सुरक्षा मजबूत करण्याला गृहमंत्रालयाचं प्राधान्य असल्याचंही ते म्हणाले. तसंच, सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या 14-सी हेल्पलाईन क्रमांक १९३० या क्रमांकाविषयी जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी समितीच्या सदस्यांना केलं.