आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. एकोणपन्नासाव्या नागरी लेखा दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.
सरकारी योजनांचा पैसा देशातल्या ६० कोटी लाभधारकांपर्यंत सार्वजनिक लेखा यंत्रणेमार्फत पोहचवण्यात येत आहे. एक हजार २११ योजनांपैकी अकराशे योजनांचा निधी थेट लाभ हस्तांतरणाने लाभार्थ्यांना दिला जातो. या खेरीज सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाविषयीचे दावे या यंत्रणेमार्फत निकाली काढण्यात येतात. या कामातल्या पारदर्शकतेसाठी अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक लेखा यंत्रणेचं कौतुक केलं.