फोनकॉलच्या माध्यमातून होणारी फसवणूक तसंच मोबाईलचा गैरवापर यांना आळा घालण्यासाठी संचार साथी नावाच्या नवीन ॲपचं अनावरण आज केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं. ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त कुटुंबाना इंटरनेट सुविधा मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या नॅशनल ब्रॉडबँड मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवातही त्यांनी केली. डिजिटल भारत निधीच्या अंतर्गत उभारलेल्या सुमारे २८ हजार मोबाइल टॉवरच्या सुविधेचा उपयोग आता कोणत्याही मोबाइल कंपनीला करता येईल. त्यामुळे ग्राहकांसाठी नेटवर्कची उपलब्धता सुधारेल.
संचार साथी या नवीन ॲप्लिकेशनविषयी…
फोन, मेसेज किंवा ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीची तक्रार करता यावी, आपल्या नावाने काढलेली खोटी फोन कनेक्शन्स ओळखता यावीत, अशा विविध तक्रारी संचार साथी या एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सोडवता येणार आहेत. यात फोनवरून होणाऱ्या सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवण्यासाठी चक्षु नावाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यात नोंदणी करताना संबंधित फोन क्रमांक किंवा मेसेजचे तपशील भरल्यानंतर ही तक्रार नोंदवली जाईल. त्या खेरीज हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन शोधून तो ब्लॉक करणं, आपल्या नावे दाखल असलेली खोटी फोन कनेक्शन शोधणं तसंच संशयित आंतरराष्ट्रीय कॉलची तक्रार करण्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत.