सध्याच्या जागतिक व्यवस्थेतली अस्थिरता तसंच अनिश्चितता पाहता बिमस्टेकच्या सदस्य देशांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करताना महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा, असं आवाहन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. थायलंडमध्ये बँकॉक इथे झालेल्या विसाव्या बिमस्टेक मंत्रिस्तरीय बैठकीला ते संबोधित करत होते.
बिमस्टेक संघटना ही भारताच्या ॲक्ट ईस्ट, नेबरहूड फर्स्ट आणि महासागर या तिन्ही उपक्रमांचं प्रतिनिधित्व करतं असल्याचंही जयशंकर यावेळी म्हणाले. बिमस्टेक देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकांत भारतीयांची संख्या अधिक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. तसंच, सायबर सुरक्षा, दहशतवाद, मानवी तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार या बिमस्टेक देशांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा अधिक गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचंही जयशंकर यांनी या बैठकीत नमूद केलं.