रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत नाशिक इथं सुरु झालेल्या बडोद्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावात दिवसअखेर ७ गडी गमावून २५८ धावा केल्या. आजचा खेळ थांबला तेव्हा सौरभ नवले ६०, तर रजनीश गुरबानी २२ धावांवर खेळत होता. सिद्धेश वीरनं ४८, तर यश क्षीरसागरनं ३० धावा केल्या. बडोद्यातर्फे अतित शेठनं ३, तर राज लिंबानीनं २ बळी मिळवले.
मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातल्या शरद पवार क्रिकेट अकादमीत आज सुरु झालेल्या सामन्यात दिवसअखेर जम्मू-कश्मीरनं पहिल्या डावात मुंबईवर ५४ धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा पहिला डाव १२० धावात संपुष्टात आला. शार्दुल ठाकूरनं ५१ धावा केल्या. जम्मू कश्मिरतर्फे उमर नाझीर आणि युध्वीर सिंग यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले.
जम्मू-कश्मीरनं पहिल्या डावात दिवसअखेर ७ बाद १७४ धावा केल्या. शुभम खजुरीयानं ५३, तर अबिद मुश्ताकनं ४४ धावा केल्या आजचा खेळ थांबला तेव्हा पारस डोग्रा १९, तर युध्वीर सिंग २ धावा केल्या.
मुंबईतर्फे मोहित अवस्थीनं ३, शम्स मुलानीनं २, तर शार्दुल ठाकूर, आणि शुभम दुबेनं प्रत्येकी १ गडी बाद केला.
जयपूर इथं विदर्भ आणि राजस्थान याच्यात सुरु असलेल्या सामन्यात विदर्भाचा पहिला डाव १६५ धावांवर संपुष्टात आला. राजस्थानतर्फे खलिल अहमदनं ५ बळी मिळवले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या राजस्थाननं दिवसअखेर ५ गडी गमावून १०१ धावा केल्या. ते ६४ धावांनी पिछाडीवर आहेत.