रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत, नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर ४ बाद १४७ धावा करत, मुंबईवर २६० धावांची आघाडी घेतली.
मुंबईचा पहिला डाव आज २७० धावांवर आटोपला. आकाश आनंदनं शतक झळकावत १०६ धावा केल्या. विदर्भातर्फे पार्थ रेखाडेनं ४ बळी घेतले. दुसऱ्या डावात, विदर्भाची सुरुवात खराब झाली. त्यांचे ४ गडी झटपट बाद झाले. मात्र त्यानंतर यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी डाव सावरला. आजचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड ५९, तर अक्षय वाडकर ३१ धावांवर खेळत होता.
अहमदाबाद इथं गुजरात आणि केरळ यांच्यात सुरु असलेल्या, पहिल्या उपांत्य सामन्यात केरळनं पहिल्या डावात ४५७ धावा केल्या. महंमद अजहरुद्दीनच्या नाबाद १७७ धावांचा त्यात मोठा वाटा आहे. गुजरातनं पहिल्या डावात दिवसअखेर १ बाद २२२ धावा केल्या. प्रियांक पांचाल आणि आर्य देसाई यांनी पहिल्या गड्यासाठी १३१ धावांची भागीदारी केली. आर्य देसाई ७३ धावांवर बाद झाला. प्रियांक पांचालनं शतक झळकावलं. आजचा खेळ थांबला तेव्हा तो ११७ धावांवर, तर मनन हिंग्राजिया ३० धावांवर खेळत होता.