रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे. नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ८० धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. विजयासाठी विदर्भानं दिलेल्या ४०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा, दुसरा डाव ३२५ धावांवर संपला. या डावात, विदर्भातर्फे हर्ष दुबेनं ५ गडी बाद केले. मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या ३ बाद ८३ या धावसंख्येवरून पुढे सुरू केल्यानंतर शिवम दुबे, सुर्यकुमार यादव आणि आणि आकाश आनंद हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर शम्स मुलानी आणि शार्दुल ठाकूर यांनी शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शार्दुल ठाकूर ६६, तर शम्स मुलानी ४६ धावा करून बाद झाला. पहिल्या डावात ५४ आणि दुसऱ्या डावात १५१ धावा करणारा विदर्भाचा यश राठोड सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला.
अहमदाबाद इथं गुजरात आणि केरळ यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात आज गुजरातचा पहिला डाव ४५५ धावांवर संपला. त्यामुळे या डावात केरळला २ धावांची नाममात्र पण महत्वाची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात केरळनं दिवसअखेर ४ बाद ११४ धावा केल्या. आज सामन्याचा शेवटचा दिवस असल्यानं सामना अनिर्णित राहिला. मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर केरळनं अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं. पहिल्या डावात नाबाद १७७ धावा करणारा केरळचा महंमद अजहरुद्दीन सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला.
विजेतेपदासाठीची अंतिम लढत येत्या २६ तारखेला सुरू होईल.