संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर आज राज्यसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. कृषी क्षेत्रासाठी सरकारने प्रयत्न केल्यानंतरही विरोधी पक्ष सरकारविरुद्ध खोटा प्रचार असल्याची टीकाही चौधरी यांनी केली. यूपीए सरकारने डॉक्टर स्वामिनाथन समितीच्या शिफारसी थंड बस्त्यात ठेवल्या होत्या, अशी टीका करतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळावं यासाठी उपाययोजना केल्या आहेत, असंही चौधरी यावेळी म्हणाल्या.
राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेवेळी बेरोजगारी, महागाई आणि रुपयाची घसरण हे मुद्दे यावेळी उपस्थित केले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मिळतील, असं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र, अद्यापही ते पूर्ण झालेलं नाही. विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदं आहेत, मात्र ती भरलेली नाहीत, अशी टीका खरगे यांनी यावेळी केली. तसंच, अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या कथित अत्याचारांचा मुद्दाही खरगे यांनी राज्यसभेत उपस्थित केला.