सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. १७व्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ नशिबाच्या जोरावर, कष्ट न करता यश मिळत नसतं, बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले. गेल्या १० वर्षात देशाने विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरणं मोदी यांनी दिली.
पीडित आणि वंचितांप्रति सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला.
प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १६ अधिकाऱ्यांना देण्यात आले. होलिस्टिक डेवलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागात मिळून १ हजार ५८८ प्रवेशिकांमधून हे १६ पुरस्कार देण्यात आले. स्मृतीचिन्ह, मानपत्र, आणि २० लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्कारांचं स्वरूप आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग, प्रधानमंत्र्याचे प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.