परदेशस्थ भारतीय जगासमोर भारताचं खरंखुरं चित्र उभं करतात असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. १८व्या प्रवासी भारतीय दिन सोहळ्याच्या समारोप समारंभात आज त्या भुवनेश्वरमधे बोलत होत्या. वैद्यक आणि तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात भारतीयांनी प्राविण्य मिळवलं आहे असं त्या म्हणाल्या.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १७ परदेशस्थ भारतीयांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. केंद्रीय मंत्री डॉ. एस जयशंकर, जुआल ओराम, धर्मेंद्र प्रधान तसंच ओदिशाचे राज्यपाल हरिबाबू कंभमपाटी, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमापूर्वी राष्ट्रपतींनी प्रवासी दिन सोहळ्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात ओदिशाची समृद्ध परंपरा साकारणाऱ्या विविध हस्तकलांची दालनं आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांना ओदिशाच्या परंपरेचं दर्शन घडवण्याच्या हेतूनं हे प्रदर्शन भरवलं आहे.