जपान देश भारताच्या आर्थिक वाढीसाठी सहकार्य करणारा प्रमुख देश असून परदेशी गुंतवणुकीचा तो पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारत-जपान अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक मंचाला संबोधित करताना ते काल बोलत होते. २००० ते २०२४ दरम्यान जपानमधून सुमारे ४३ अब्ज डॉलर पेक्षा अधिक ‘थेट परकीय गुंतवणूक’ झाली असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
दोन्ही देशांमधली बंधुता, लोकशाही, संस्कृती आणि आर्थिक सहकार्यामध्ये असलेली जागतिक स्तरावरची धोरणात्मक भागीदारी विशेष असून २०११ मध्ये स्वाक्षरी केलेल्या ‘व्यापक आर्थिक भागीदारी करारानं’ व्दिपक्षीय व्यापार लक्षणीयरित्या मजबूत झाल्याचं गोयल म्हणाले. अंदाजे १४०० पेक्षा अधिक जपानी कंपन्या भारतात कार्यरत असून अनेक मोठे पायाभूत विकास करणारे जपानी कंपन्यांचे प्रकल्प भारताच्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत, असं त्यांनी सांगितलं.