आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते.
सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या लागतील, त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं गडकरी म्हणाले. या परिषदेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झाला. आदिवासींच्या आरोग्याच्या समस्या दूर करणं केवळ भारतच नाही तर जगाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, असं ते यावेळी म्हणाले. आदिवासींची पारंपरिक उपचार पद्धती आणि आधुनिक वैद्यकीय कौशल्याचा संगम करूनच आदिवासींपर्यंत आरोग्य सेवा निटपणे पोहोचवता येतील असं त्यांनी सांगितलं.