महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक समानता असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातले परस्पर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचं स्वागत करेल, असं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसुफ यांनी मंगळवारी रावल यांची सह्याद्री अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
नाशिकचा कांदा आणि द्राक्षं, कोकणचा हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असंही रावल यांनी सांगितलं.