शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवण्याचं आश्वासन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात वावी इथल्या जामनदी खोरे शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ हजार टन क्षमतेच्या गोदामाच्या बांधकामाचा प्रारंभ करताना बोलत होते.
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं निर्माण झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठबळामुळे या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शेतीत भांडवली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असून त्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, असं कोकाटे म्हणाले.
शेतीतील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे, असेही आवाहन कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी केले.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.