केवळ कच्च्या मालाची निर्यात करून विकासाचा वेग वाढणं शक्य नसून विकासदर वाढवण्यासाठी संपूर्ण औद्योगिक परिसंस्थेत सुधारणा करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. भुवनेश्वर इथे उत्कर्ष ओदिशा- मेक इन ओदिशा कॉनक्लेव्हच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक सशक्त परिसंस्था निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि उद्योगांना या प्रयत्नात सरकारसोबत सहकार्य करण्याचं आवाहनही केलं.
उत्कर्ष ओदिशा ही ओदिशा सरकारतर्फे आयोजित केलेली एक प्रमुख जागतिक गुंतवणूक शिखर परिषद असून त्याचा उद्देश ओदिशाला भारतातलं एक आघाडीचं गुंतवणूक केंद्र आणि औद्योगिक केंद्र बनवणं असा आहे. दोन दिवसांच्या या परिषदेद्वारे पाच लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक व्हावी, असं ओदिशा सरकारचं उद्दिष्ट असून यामुळे साडे तीन लाख रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.