छत्रपती शिवाजी महाराजांंच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.
राज्य शासनानं ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.