राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यात त्यांनी नवीन औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा त्यांनी यावेळी केली.
नव्या औद्योगिक धोरणातून ५ वर्षात ४० लाख कोटींची गुंतवणूक, ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे. केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेनुसार नवं कामगार धोरण राज्य सरकार तयार करणार आहे. मुंबईत गेटवे इंडियापासून मांडवा आणि एलिफंटा पर्यंतच्या जल प्रवासासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकार जाहीर करणार आहे. याशिवाय राज्याचे नवे आरोग्य आणि जेष्ठ नागरिक धोरण तसंच गृहनिर्माण धोरण लवकरच सरकार जाहीर करणार आहे.
हवाई वाहतूक, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. नवी मुंबईत अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर उभारलं जाणार आहे. याशिवाय मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे.
अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ राज्य सरकार तयार करणार आहे. याअंतर्गत पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्यं, ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वसाहतीतल्या रस्त्यांचे काम केले जाणार आहे. ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन सरकारन केलं आहे. याशिवाय ठाण्यात बाळकुम ते गायमुख किनारी मार्ग आणि उत्तन ते विरार सागरी सेतू बांधण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. येत्या वर्षात मुंबईत ४१ किलोमीटर तर पुण्यात २३ किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार असून येत्या ५ वर्षात राज्यात २३७ किलोमीटरचे मेट्रो मार्ग राज्यात सुरू करण्याचं नियोजन आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पुढच्या महिन्यात तर अमरावतीतल्या बेलोरा विमानतळावरुन महिनाअखेर वाहतूक सुरू होणार आहे, असं त्यांनी आज जाहीर केलं. एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी सरकार अर्थसहाय्य देणार असून ६ हजार डिझेल बसचे CNG, LNG मध्ये रुपांतर करण्याचं काम सुरू आहे.