संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरु झालं. लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षासाठी विविध विभागांच्या खर्चासाठी ५१ हजार ४६२ कोटी ८६ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या रकमेतले निवृत्तीवेतनासाठी १३ हजार ४४९ कोटी रुपये आणि खतांवरच्या अनुदानासाठी १२ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अतिरिक्त खर्चासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लोकसभेत २०२५-२६ यावर्षासाठी मणिपूरशी संबंधित अर्थसंकल्पही सादर केला.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत जहाजात माल चढ उत्तर करण्यासंबंधित विधेयक २०२४ सादर केलं. हा कायदा व्यवसाय सुलभीकरणासाठी उपयोगी पडेल, असं सोनोवाल यावेळी म्हणाले. हे विधेयक मंजुरीनंतर याच संबंधातल्या १८५६ पासून अस्तित्वात असलेल्या कायद्याची जागा घेईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ राज्यसभेत सादर केलं. हे विधेयक रेल्वे कायदा १९८९ मध्ये सुधारणा घडवून रेल्वे बोर्डाची शक्ती आणि स्वातंत्र्य वाढवण्यासाठी मदत करणार आहे.