इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारताने ३-० अशी जिंकली आहे. अहमदाबाद इथं काल झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव करून मालिका विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताच्या ३५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३५ व्या षटकांत २१४ धावांवर आटोपला. इंग्लंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. टॉम बँटन यानं केलेल्या ३८ धावा ही त्यांच्या खेळाडूंची सर्वोच्च धावसंख्या होती. भारताच्या अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, हार्दिंक पंड्या आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदिप यादव यांनी इंग्लंडच्या एका एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला.
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी शानदार खेळाचं प्रदर्शन करत धावांचा डोंगर रचला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाला तरी शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. शुभमन गिल याने १४ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं. तर कोहलीने अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी करत धावसंख्येत मोलाची भर टाकली. इंग्लंडच्या मार्क वुड याने भारताचे दोन गडी बाद केले.