गती शक्ती उपक्रमाद्वारे भारत सरकारने व्यवसायानुकूलता वाढवली असून आधुनिक पायाभूत सोयी सुविधा, सार्वजनिक डिजिटल सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. इटली-भारत व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारने राबवलेल्या विविध सुधारणांमुळे भारतात उद्योग सुरु करण्याचं आकर्षण जगात निर्माण झालं आहे असं ते म्हणाले.
युरोपीय संघाच्या आयुक्तवृंदाच्या भारत दौऱ्यात मुक्त व्यापार करारावरची बोलणी या वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचा उल्लेख केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी या कार्यक्रमात केला. भारत – इटली संयुक्त धोरण आणि कृती आराखडा उभय देशांच्या समृद्धीची वाट आहे, असं ते म्हणाले. इटलीचे उपप्रधानमंत्री अँटोनियो ताजानी यावेळी उपस्थित होते. भारत प्रचंड क्षमतेची अर्थव्यवस्था असून इटलीला भारताबरोबर सहकार्य दृढ करायचं आहे, असं ते म्हणाले.