अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या जनतेला आयुष्मान भारत योजनेपासून वंचित ठेवल्याची टीका भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. नवी दिल्लीत नरेला इथं ते प्रचारसभेला संबोधित करत होते. केजरीवाल यांच्या राजवटीत दिल्लीतल्या पायाभूत सुविधांचा ऱ्हास झाला, दिल्ली गेल्या दहा वर्षांत पाणीपुरवठा आणि कचऱ्याच्या समस्येशी झुंजत आहे, असं शहा म्हणाले. भाजपाची सत्ता आल्यावर प्रत्येक नागरिकाला १० लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळतील असं आश्वासन शहा यांनी दिलं.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दिलेले पैसे भाजपा सरकार परत घेत असल्याचा आरोप आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. भाजपा सत्तेत आल्यावर सर्व कल्याणकारी योजना बंद करेल आणि मध्यमवर्गीयांना २५ हजारांचा बोझा सहन करावा लागेल असं ते म्हणाले. तर, भाजपा मतं मिळवण्यासाठी समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.