आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला. केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगालला पुरेश तरतूद मिळालेली नाही, असाही आरोप बॅनर्जी यांनी केला. तर भाजपाचे राव राजेंद्र सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणार असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं. तसंच, केंद्र सरकारच्या विविध क्षेत्रातल्या कामगिरीवरून आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांचीही सिंह यांनी यावेळी प्रशंसा केली.