जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेलं जलयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान असून लोकसहभागातून झालेली कामं जलक्रांतीच्या दिशेनं पडलेलं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत ६०१ नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचं ऑनलाईन पध्दतीनं वितरण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. प्रातिनिधीक स्वरुपात ६ उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्ती पत्रांचं वितरण मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या समारंभात करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई दूर करून शाश्वत शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणं हा जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं फडणवीस म्हणाले. नवनियुक्त अधिकाऱ्यांनी सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचं ध्येय बाळगण्याचं आवाहन जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलं.