प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. शाह यांनी आज पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना स्वीकृती पत्रांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते. हे सरकार नागरिकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासोबतच, त्यांना स्वयंपाकाचा गॅस सौर उर्जेचाही पुरवठा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते राज्यातल्या २० लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित केली गेली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
सहकार क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचं तसंच २०२७ पर्यंत अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकणार नाही असं केंद्रीय गृह तसंच सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पुणे इथं जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात बोलत होते. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधक सोसायटीचं देशातील पहिलं क्षेत्रीय कार्यालय पुण्यात सुरू करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणं देशभरातील सहकारी बँकांना सहकार्य करुन आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची २७ वी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, दादरा नगर हवेली आणि दीव दमणचे प्रशासक प्रफुल पटेल आणि या क्षेत्रातल्या राज्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.