‘शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि जीवनरेखा आहे’, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं पुसा-कृषी विज्ञान मेळ्याचं उदघाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी आणि शेतीशिवाय, विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच सरकार कृषी क्षेत्रात सातत्यानं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान शिवराज चौहान यांनी हरियाणात गुरुकुल कुरुक्षेत्र इथल्या नैसर्गिक पद्धतीनं केलेल्या शेतीचीही पाहणी केली. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत राष्ट्रीय स्तरावर समिती स्थापन करून या अभियानाला चळवळीचं स्वरूप दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं.