रायगड आणि नाशिक इथल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. आज पालकमंत्री बदलतील, तर उद्या उपमुख्यमंत्री बदलतील. बहुमत मिळूनही महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. एकनाथ शिंदे यांची भाजपाला गरज उरली नसून शिवसेनेत नवीन उदय होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.
पालकमंत्रिपदाला स्थगिती देणं हा त्या पदाचा अपमान असून मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याची दादागिरी कशी सहन करतात याचं आश्चर्य वाटतं, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद आणि बंगल्यासाठी भांडणं होत आहेत, हे जनतेची सेवा कशी करणार याचा विचार जनतेनं करावा असं ठाकरे म्हणाले.
सैफ अली खान हल्ला प्रकरणावरून ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. पोलिसांना स्वातंत्र्य दिल्यामुळे सैफवर हल्ला करणाऱ्याला पोलीस पकडू शकले मात्र मस्साजोग इथल्या सरपंचाच्या हत्येत आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशातून भारतात आला. म्हणजे केंद्र सरकार अकार्यक्षम आहे असं ठाकरे म्हणाले.