महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै – ऑगस्ट २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितलं.
येत्या मंगळवारपासून परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून १५ मे पर्यंत नोंदणी करता येईल. दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांनी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करावी, असं आवाहन मंडळानं केलं आहे. याबाबत मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.