जलद विकासासाठी डिजिटलायझेशनच्या गरजेचा संदर्भ देत, जगानं याबाबतीत भारताचं उदाहरण अभ्यासावं असं सांगत भारतानं गेल्या पाच सहा वर्षात डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे, असं प्रतिपादन संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78 व्या सत्राचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केलं. ते काल रोममध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात आयोजित ‘सद्यकालीन आणि भविष्यात एकही व्यक्ती भुकेली राहू नये यासाठी करण्यात येणाऱ्या प्रगतशील उपाययोजना’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. भारतातला ग्रामीण भागातला शेतकरी वर्गाचा याआधी कधीही बँकिंग व्यवस्थेशी फारसा संबंध नव्हता ते आता त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीनं सहज आर्थिक व्यवहार करत आहेत,असंही फ्रान्सिस यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितलं. भारतात इंटरनेटचा सर्वाधिक वापर होत असून जवळजवळ प्रत्येकाकडं मोबाइल आहे असंही त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.
Site Admin | August 3, 2024 10:13 AM
भारतानं डिजिटलायझेशनद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं उदाहरण जगानं अभ्यासावं- डेनिस फ्रान्सिस
